रयत शिक्षण संस्था :
कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात २०१७ साली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसती गृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, ५ तंत्र विद्यालये, ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ८ डी.एड. महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेल्या मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, ५८ आयटीआय व इतर. एकूण संस्था ६७९, एकूण विद्यार्थी सुमारे साडेचार लाख व सेवक १६,९४८ आहेत.
संस्थेची उद्दिष्टे -
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील काले या गावी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'रयत शिक्षण संस्था' या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी असा ठराव मांडला व तो एक मताने मंजूर झाला. ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वत:च्या मालकीची जमीन करणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला 'रयत शिक्षण संस्था' हे नाव सार्थ वाटते.
खालील प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन रयत शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
- बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
- मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
- निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
- अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे.
- एकीचे महत्त्व कृतीने पटवून देणे.
- सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
- बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
- कमवा आणि शिका .
No comments:
Post a Comment